● लोणार प्रतिनिधी
विद्युत खांबावरील तार गोठ्यावर तुटून शॉर्टसर्किट झाल्यामुळे साठवून ठेवलेला गोठ्यातील दहा क्विंटल कापूस जळाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना आज, २७ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास किनगाव ज येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
किनगाव जट्टू येथील श्रीराम आश्रुजी गायकवाड यांच्या शेतात गोठा व कांदा चाळ आहे. त्यांची गुरे ते शेतातच बांधतात. गोठ्याजवळच रोहित्र आहे. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान खांबावरील तार अचानक तुटून गोठ्यावर पडून शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे गोठ्यात साठवून ठेवलेला १०
क्विंटल कापूस जळून खाक झाला. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गोठ्याजवळच गुरे, गुरांचा चारा गुरे आणि कार उभी होती. यावेळी गोठ्यातून धूर बाहेर येत असल्याचे एका गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्याला सांगितल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान, तलाठी वसुदेव जायभाये यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
