महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या अनेक मोकळ्या भूखंडांबाबत गेली अनेक वर्षे चर्चा होत आहे. भूखंड शोधून त्यावर महापालिकेचे नाव लावण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शहरातील ४०० पेक्षा अधिक मोकळे भूखंड कोणाच्या मालकीचे आहे, याबाबत महापालिकेत नोंद नाही. शिवाय अनेक भूखंडाची भाडेतत्त्वाची मुदत (लीज) संपली तरी त्या जागेवर ताबा कायम असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार वेगाने होत आहे. शहराला लागून असलेल्या अनेक वस्त्यांमध्ये मोकळे भूखंड आहे. त्यातील काही भूखंडावर अतिक्रमण करून काही लोकांनी दुकाने थाटली असून त्यांच्याकडून कुठलाही कर वसूल केला जात नाही. शहरात आठ वर्षांपूर्वी ३२ हजार भूखंडाची नोंद होती. त्यात विस्तार होत असताना जवळपास दीड हजार मोकळ्या भूखंडांची आणखी भर पडली आहे.
