वाघाच्या शिकारीनंतर महाराष्ट्रातील सीमा भागात वाघाचे चामडे व अवयव घेऊन टोळी येणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांनी जिवती तालुक्यातील पाटागुडा गावी सापळा रचला. यावेळी वाघाची चामडी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना ताब्यात घेतले.
आरोपींची चौकशी केली असता या वाघाची शिकार तेलंगणा राज्यातील असिफाबाद नजिकच्या भागात करून त्याची चामडी तस्करी करण्याकरिता महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या जिवती येथील पाटागुडा गावात आणल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी ज्या सहा आरोपींना अटक करण्यात आली त्या सर्वांची नावे वन विभागाने गोपनीय ठेवली आहेत. यातील काही आरोपी तेलंगणा व महाराष्ट्रातील आहेत.
