सुमेध दामधर प्रतिनिधी
संग्रामपूर ( 20 मार्च 2026) : तालुक्यातील वकाणा - निरोड व वकाणा - भीलखेड या दोन महत्त्वाच्या मार्गांवरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या रस्त्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे दिनांक 23/03/2026 पासून ते जबाबदार शासन व प्रशासन, लोकप्रतिनिधी व खोटे लेखी आश्वासन देणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाराविरुद्ध बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण वकाना व रुधाना गावाच्या मध्यभागी बाजारात होणार आहे.या संदर्भात संबंधित विभागाला वारंवार ऑल इंडिया पँथर्स सेना च्या वतीने निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही दिनांक ६ जून २०२५ पासून बेमुदत मचान आंदोलन करण्यात आले होते, तसेच २२ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्रही देण्यात आले होते. मात्र अद्यापही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यांचे काम सुरू करावे, अन्यथा २३ मार्च २०२६ पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय भाई वानखडे यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा ठाम इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. एकूणच, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता रस्त्यांच्या प्रश्नावर संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
