सम्यक घुले प्रतिनिधी - यवतमाळ
महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलनाला दि. २६ जुन २०२६ रोजी ५०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंदोलनस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून देशभरातील विविध राज्यांतून आलेले बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी आंदोलनकर्त्यांप्रती एकजूट आणि पाठिंबा व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमात मार्शल सुनील सारिपुत्त (उपाध्यक्ष, राष्ट्रीय समिती), मार्शल प्रकाश दर्शनीक (प्रवक्ते, राष्ट्रीय समिती),चंद्रबोधी पाटील (भारतीय बौद्ध महासभा) मार्शल दीपक वाघमारे (दक्षिण भारत संयोजक, SSD) आणि मार्शल अंगद उके यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी उपोषणकर्त्या बौद्ध बांधवांचे मनोबल वाढवत, हा संघर्ष न्याय आणि बौद्ध समाजाच्या हक्कांसाठीचा असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेले आंदोलन शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पुढे जात असल्याचे नमूद केले. ५०० दिवसांचा हा संघर्ष समाजाच्या एकजुटीचे आणि निर्धाराचे प्रतीक असून, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाच्या ५०० दिवसांच्या निमित्ताने परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांनी एकात्मतेची शपथ घेतली. "महाबोधी महाविहाराची मुक्ती" हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला....
