जिंतूर प्रतिनिधी
गावात वास्तव्यास नसणे, कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे आणि समाधानकारक खुलासा सादर न केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील हांडी येथील पोलिस पाटील अमोल विठ्ठलराव राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,शैलेश लाहोटी यांनी केली असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
प्राप्त माहितीनुसार,मौजे हांडी येथील पोलिस पाटील अमोल राठोड हे गावात नियमित वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार प्राप्त होत होत्या. पोलिस पाटील हे गावात राहत नसून पुणे व नाशिक येथे खासगी नोकरी करत असल्याची गोपनीय व विश्वासार्ह माहिती प्रशासनाला मिळाली होती. पोलिस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र संबंधित पोलिस पाटील गावातच अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक बामणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता संबंधित पोलिस पाटील गावात राहत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे अमोल राठोड यांना नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र,नोटीसला दिलेला खुलासा प्रशासनाच्या दृष्टीने असमाधानकारक ठरल्याने उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिनांक 2 जून 2026 रोजी आदेश काढून अमोल विठ्ठलराव राठोड यांना पोलिस पाटील पदावरून निलंबित केले.
या कारवाईमुळे पोलिस पाटील पदावरील जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी लागणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. गावातील नागरिकांच्या समस्या, कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस पाटील गावात उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
स्थानिक स्तरावर या निर्णयाचे स्वागत होत असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
