जिंतूर | प्रतिनिधी / पंकज चव्हाण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री. कॉम्प्युटर, जिंतूर यांच्या वतीने श्री नेमगिरी संस्थान येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नेमगिरी संस्थानचे अध्यक्ष श्री. विरेंद्रकुमार सावजी कळमकर होते.
यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी, अमित शिराळकर, श्री. कॉम्प्युटरचे संचालक संतोष चौधरी,डॉक्टर असोसिएशन तालुकाध्यक्ष डॉ. शिवप्रसाद सानप, पत्रकार सचिन रायपत्रीवार, महेश देशमुख व शंतनु कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वड, पिंपळ, गुलमोहर, बेल, निलगिरी, जाबूल, आदी आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी संतोष चौधरी यांनी १०० हून अधिक वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचा संकल्प जाहीर केला. वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. तसेच महाराष्ट्र AI रेडी या मोफत कोर्स चे सर्टिफिकेट मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करिता संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी सौ. नवले मॅडम, कळूजी राऊत, विद्यार्थी, वाघ, पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.
