६ महिन्यांपासून रस्ता खोदलेलाच; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खुलताबाद शहरात विकासकामांच्या नावाखाली नागरिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून, शहरातील प्रवेश मार्ग हॉटेल ग्रीन पार्क ते पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून खोदलेलाच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेया प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करत जिल्हा प्रशासन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संबंधित अभियंते तसेच कार्यकारी एजन्सीविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २८ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार देऊनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रस्ता खोदलेलाच राहिल्याने शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या
सहा महिन्यांपासून शहरातील मुख्य मार्ग खोदून ठेवल्याने गैरसोयीने नागरिकांचे हाल होत आहेत.
पर्यटकांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. तरीही संबंधित एजन्सी व अधिकाऱ्यांवर कारवाई न होणे, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एजन्सीला काळ्या यादीत टाका
शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि एजन्सीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे. तसेच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी इकबाल पटेलसह नागरिकांनी केली आहे.
