प्रतिनिधी धनंजय माळेकर. दि.20/5/2026
रिसोड:दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या संचालक मंडळाकडून पगारदार अपघात विमा पॉलिसी लागू करण्यात आली आहे. या विमा योजनेचा संपूर्ण प्रीमियम बँकेमार्फत स्वखर्चाने भरला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ पगारदार कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अपघात विम्याचा लाभ मिळाला आहे.
रिठद शाखेचे पगारदार कर्मचारी तथा येवती येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे शिक्षक कै. विजय सदाशिव कालवे यांचे अपघाती निधन झाले होते. सदर घटनेची माहिती रिठद शाखेचे शाखाधिकारी संतोष घुगे यांना मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती मुख्य कचेरीतील हिशेब व बँकिंग विभागाचे प्रफुल पाटील यांच्याकडे पुढील विमा क्लेम कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.
बँकेकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बँकेच्या पगारदार अपघात विम्यांतर्गत रु. ३० लाखांचा विमा दावा मंजूर करण्यात आला. ही विमा रक्कम मृत शिक्षक कै. विजय सदाशिव कालवे यांच्या पत्नी श्रीमती किरण विजय कालवे यांना बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक मा.डॉ. संतोषकुमार कोरपे, अध्यक्ष डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे, उपाध्यक्ष रामेश्वर सुभाषराव ठाकरे, माजी संचालक तथा आमदार मा. अमितजी झनक, संचालक डॉ. धिरज वामनराव देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी कव्हर, राजस्थान विद्यालयाचे मुख्यद्यापक विवेक ठाकरे , पत्रकार सतीशभाऊ मांदळे, तालुका प्रतिनिधी , एस. पी. तलवारे, मार्केटिंग अधिकारी ग्रेड-१ पी. एन. जाधव, शाखाधिकारी आर. टी. मस्करे, एस. पी. कोकाटे, सर्व निरीक्षक, डी. ए. मुंढे, कार्यालयीन सचिव देखरेख संघ, बी. एन. मोरे, सर्व सचिव तसेच रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच बँकेच्या रिसोड मुख्य शाखा व रिठद शाखेचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या अपघात विमा योजनेमुळे आतापर्यंत २७ पगारदार कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत मिळाली आहे. याबद्दल मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले.
