रिसोड शहर प्रतिनिधी.धनंजय माळेकर
रिसोड तालुक्यातील येवती येथील शेतकरी सुरेश किसन शिंदे यांच्या शेतातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे वादळामुळे नुकसान झाले आहे. गट क्रमांक १९९ मधील शेतात बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलपैकी एका प्लेटचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात एकूण १४ सोलर प्लेट बसविण्यात आल्या होत्या. मात्र, अलीकडे झालेल्या जोरदार वादळ आणि वाऱ्यामुळे एका प्लेटला मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून सौर ऊर्जेच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संबंधित सोलर कंपनीने या घटनेची तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त प्लेट बदलून द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरेश शिंदे यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या उपकरणांची त्वरित दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
